Friday, February 24, 2012

आपली कागदी संस्कृती

आपण जन्माला येताना काय सोबत आणतो?                            
प्रश्न तसा साधाच पण उत्तर कठीण आहे.कुणी म्हणतील भाग्य,कुणी म्हणतील प्राक्तन,कुणी म्हणेल मन वगैरे वगैरे.उत्तरं सापेक्ष असणार,हे खरेच आहे.पण आपल्या सध्याच्या संस्कृतीबद्दल बोलावयाचे झाल्यास मी म्ह्णेन की आपण जन्माला येताना 'कागद' घेऊन येतो! होय,birth certificate नावाचा कागदाचा एक तुकडा! अन् येथूनच आपलं कागदी आयुष्य सुरु होतं. हा कागद तुम्हाला तुम्ही एकदाचे जन्माला आलेले आहात हे बजावतो! तुमच्याजवळ हा कागद नसेल तर मग तुमचं काही खर नाही कारण तुम्ही जरी समोर जिवंत दिसत असलात तरी त्याला पुरावा काय बाबा? मग सारचं अडत जात.तुम्हाला बालवाडीत किंवा नर्सरीत प्रवेश मिळत नाही.मग तुमचे आईवडील बिचारे कोणत्यातरी डॉक्टरचं तुमच्या जन्माचं खोटं सर्टीफिकेट आणतात.ते घेऊन तलाठी वा म्युनिसिपल कार्यालयात लाच देऊन खोटा जन्मदाखला घेतात.अश्याप्रकारे एकदाचे तुम्ही बालवाडीत वा तत्सम 'शाळेत' जाता.मग वर्षभर कागदांचा खेळ चालतो-त्यात तुमच्या वडिलांचा उत्पन्नाचा दाखला,त्यांचा जातीचा दाखला,त्यांचा रहिवासाचा पुरावा क्वचित वेळा तुमच्या वडिलांचा विवाहदाखला सुद्धा मागितला जातो.दरवर्षी तुम्ही पास झाल्याचा एक कागद मिळवून वरच्या वर्गात जाता आणि तुमचा कागदांचा संग्रह वाढत जातो. तुमच्याजवळ जेवढे जास्त कागद,तेवढे तुम्ही great!एकदाचे तुम्ही १२ वी वगैरे झालात की मग तर कागदांचा भला मोठा पेटाराच तयार होतो.त्यात खरे खोटे मात्र सारे अधिकृत कागद असतात आणि हे फक्त तुम्हाला किंवा तुम्ही ज्या ठिकाणच्या ज्या सरकारी वा खाजगी अधिकाऱ्याकडून मिळवलेले असेल ,त्यालाच माहित असतात.नंतर असंख्य कागदांचा अभ्यास करून तुम्ही एखाद्या ठिकाणी कागदी नोटा देऊन नोकरीला चिकटता.आणि आयुष्यभर कागदावर कागद जमा करत राहता! नंतर तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्हाला तीच कागदांची उठाठेव करत राहता.तुम्ही तुमच्या आजोबांचा जन्मदाखला सुद्धा मिळवता,कारण आता तुम्ही बरेच अनुभवी असता.कोठून काय आणि कसे मिळते,हे तुम्हाला आता चांगलेच माहित झालेले असते.स्वतःच्या आजारपणाचा खोटा दाखला देऊन तुम्ही वैद्यकीय रजा आणि बिल सुद्धा मिळवता,आणि त्या रजेच्या कालावधीत मस्त कुटुंबासोबत फिरून बिरून येता !

खाजगी वा सरकारी कार्यालय कोणतेही असो.लाच दिल्याशिवाय तुमचे काम नाहीच होत! शाळेत जुन्या मास्तरांनी शिकवलेले धडे चोरी करू नये,खोटे बोलू नये,सर्व बंधू समभाव ,अडचणीतल्या मित्रास मदत करावी वगैरे आपण हळूहळू विसरत जातो.श्यामची आई वाचून हुंदके देऊन कधीकाळी रडणारे आपण आज अगदी निगरगट्ट झालो आहोत.स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या वीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढायचे आपल्याला. ते आपण थंड रक्ताचे झालो आहोत.आपण स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली वाहतो,तेव्हा आपलं लक्ष त्या त्या वीरांच्या वा प्रतिमेकडे कमी आणि फोटोग्राफरकडे जास्त असतं.काही सुशिक्षीत सुसंस्कृत महाभाग तर शाळेत मुलांना सोडायला जाताना राष्ट्रगीत सुरु असेल तरीही कुणाशीतरी मोबाईलवर बोलताना आढळतात.किंवा त्यांची एखाद्या समकक्ष सहकाऱ्याशी चर्चा चाललेली असते-त्यांचे विषय असतात-'सहाव्या वेतन आयोगाच्या  फरक इतका मिळाला.वेतनश्रेणी ही मिळाली ,शेयर्समध्ये किती गुंतवले,इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी पॉलिसी घेतली वगैरे वगैरे..किती संकुचित झालो आहोत आपण! रोज भ्रष्टाचाराचा एक नवीन धडा आपण अंगी बाणवत चाललेलो आहोत.कुणाचे होवो न होवो,आपले काम आपल्याला करून हवे असते.त्यासाठी लाच द्यायला आपण सतत तयार असतो.आणि घेणारेही.

या देशात बोगस रेशनकार्ड २०० रुपयात आणि एका दिवसात मिळते.पण प्रामाणिकपणे मिळवायला जाल तर किती दिवस,महिने  किंवा वर्षेपर्यंत थांबावं लागेल,सांगता येत नाही.'उद्या या,आठवड्याने या,कार्ड शिल्लक नाहीत,त्या अमक्याला भेटा,पुढ्च्या महिन्यात या' अशी उत्तरे मिळणार!अश्या प्रकारे दहा चकरा मारल्यानं वैतागून तुम्ही त्या ऑफिसात जाणेच बंद करून टाकता.या  देशात एकवेळ पासपोर्ट लगेचच मिळतो,पण सर्वसामान्यांना आवश्यक रेशनकार्ड मात्र मिळत नाही.हे सामान्य माणसाचं आणि ज्या देशात तो राहतो,त्या भारत देशाचं मोठं दुर्दैव आहे.अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आणि गरज म्हणून आपण लाच द्यायला सुरुवात करतो का?कदाचित
होय! पूर्वी चकरा मारून मारून आपण लाच द्यायला उद्युक्त होत होतो.आता काम आणखीच सोपे झाले आहे.आता लाचेचे रेट्स ठरलेले आहेत.तेवढे पैसे 'थ्रो प्रॉपर च्यानेल' दिलेत की बाबू लोक तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे घरपोच देतात.ज्यांना हे जमत नाही,त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.डार्विनच्या सिद्धांतानुसार तुम्ही आपल्या कागदी संस्कृतीत जगण्यास नालायक ठरता.

जग झपाट्याने बदलत आहे. पत्राची जागा १२ -१५ वर्षांपूर्वीच मोबाईलने घेतली आहे.कागदपत्रांची देवाणघेवाण फ्याक्स,इमेल्सनी केली जात  आहे.व्हिडीओ कॉन्फरनसिंग, लाइव चाट,वगैरे प्रकार आपल्यासाठी नेहमीचे गरजेचे झाले आहेत.विदेशात सर्व सरकारी कार्यालयांतून अश्या माध्यमांचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे.भारतातही आता व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत.आणि खाजगी कार्यालयांमधून त्याचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला जात आहे.मात्र सरकारी कार्यालयांच काय? या सर्व सुविधा असूनही कामाला गती का मिळत नाही?कारण एकच आहे-आणि ते म्हणजे आपण आपल्या कागदी संस्कृतीत अडकून पडलो आहोत. आजपर्यंत किती लोकांनी ७-१२ चा उतारा ऑनलाईन मिळवला आहे?काही मोजक्या सरकारी बँका सोडल्यास इतर कार्यालयांच्या ठिकाणी तुमची निराशाच होणार!न्यायालयांचे उदा.घेऊ.प्रत्येक कोर्टात इंटरनेट,फ्याक्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.त्यांचा वापर केला जातो का? केला जात असल्यास केवळ अपवादानेच.  आरोपीला समन्स बजावताना कोर्टाच्या सही-शिक्क्यासह असलेले बंद पाकीट लागते.त्याशिवाय पोलीस ते बजावत नाहीत. कोर्टाने त्या त्या पोलीस स्टेशनला तसा फ्याक्स किंवा इमेल पाठवला तर?आणि आरोपीच्या  मोबाईल,ईमेल आयडीवर सरळ सम्पर्क साधला तर काय होईल? तो पळून पळून कुठे जाणार? तुम्हाला त्याच्या मोबाईलचे लोकेशन काही सेकंदात समजू शकते.मात्र त्यासाठी  संबंधित कर्मचाऱ्याना  या सर्व गोष्टींचे ज्ञान असायला हवे.असे ज्ञान असूनही किती लोक त्याचा वापर करतात?आजची न्यायालयांची परिस्थिती फार वाईट आहे;असे नाईलाजाने म्हणावे लागते.किती जणांना न्याय मिळतो?आणि किती जणांना 'पुढची तारीख ' मिळते? हे सर्व कशामुळे घडते?
फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या यंत्रणेमुळे;आपल्या कागदी संस्कृतीमुळे!